ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था या पार्श्वभूमीवर भारत सरकारचा महत्वाचा निर्णय
1 min read
दिल्ली दि.१५:- ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची ॲडव्हायझरी जारी केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून,
जे नागरिक सध्या तिथे वास्तव्यास आहेत त्यांना तातडीने उपलब्ध साधनांनी देश सोडण्याचा सल्ला दिला आहे.जे भारतीय नागरिक सध्या तिथे आहेत, मग ते विद्यार्थी, पर्यटक, भाविक किंवा व्यावसायिक असोत, त्यांनी उपलब्ध व्यावसायिक विमानांनी किंवा इतर वाहतूक साधनांनी लवकरात लवकर ईरान सोडावे.
यासोबतच, जे भारतीय नागरिक अद्याप त्या ठिकाणी आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारच्या निदर्शनांपासून किंवा गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहावे, अत्यंत सावधगिरी बाळगावी आणि तेहरानमधील भारतीय दूतावासाच्या सतत संपर्कात रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दूतावासाने नागरिकांना त्यांचे पासपोर्ट, ओळखपत्रे आणि इतर महत्त्वाची इमिग्रेशन कागदपत्रे सदैव स्वतःजवळ आणि तयार ठेवावीत. तसेच, ज्या नागरिकांनी अद्याप दूतावासाकडे आपली नोंदणी केलेली नाही, त्यांनी तात्काळ अधिकृत लिंकवर(https://www.meaers.com/request/home) जाऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.
जर इंटरनेटच्या समस्येमुळे ईरानमध्ये ही नोंदणी करणे शक्य नसेल, तर भारतातील त्यांच्या कुटुंबियांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.आपत्कालीन मदतीसाठी भारतीय नागरिक +989128109115,
+989128109109, +989128109102 आणि +989932179359 या मोबाईल क्रमांकांवर किंवा cons.tehran@mea.gov.in या ईमेलवर संपर्क साधू शकतात.
