बळीराजाला मोठा दिलासा, शेतकऱ्यांसाठी 13 ते 15 हजार कोटींच्या मदतीची आज घोषणा होणार?
1 min read
मुंबई दि.७:- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतून एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मोठे आर्थिक पॅकेज जाहीर केले जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. या पॅकेजसाठी सुमारे 13 ते 15 हजार कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असू शकते. अतिवृष्टीमुळे राज्यातील सुमारे 72 ते 73 लाख शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना त्वरित दिलासा देण्यासाठी हे विशेष पॅकेज तयार करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या सरकारने मागील एकनाथ शिंदे सरकारने जाहीर केलेल्या मदतीपेक्षा प्रति हेक्टरी किमान 2 ते 5 हजार रुपये अधिक मदत देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. नुकसानीचे पंचनामे झालेल्या भागांमध्ये या पॅकेजअंतर्गत आर्थिक मदतीचे वाटप केले जाईल आणि पुढील आठवड्यापासून या मदतीचे प्रत्यक्ष वितरण सुरू होण्याची अपेक्षा आहे.
तसेच केवळ शेतीच नव्हे तर बुजलेल्या 11 हजार विहिरींनाही मदत देण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी अतिवृष्टीचे निकष बदलले जाणार आहेत. या पॅकेजच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जासंदर्भातही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती,
कर्जाचे पुनर्गठन आणि ओल्या दुष्काळाचे सर्व निकष लागू करणे यावरही शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. यासोबतच शेतीसाठी लागणाऱ्या मातीवर आता रॉयल्टी आकारली जाणार नाही, असा निर्णयही अपेक्षित आहे.
शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांना शुल्कमाफी देण्यासारखे अनेक कल्याणकारी निर्णय घेऊन सरकार शेतकऱ्यांना सर्वंकष मदत देण्याचा प्रयत्न करणार आहे.