PSI अश्विनी केदारी च्या मृत्यूच कारण आलं समोर

1 min read

पुणे दि.९:- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत २०२३ मध्ये महाराष्ट्रातून मुलींमधून प्रथम आलेल्या अश्विनी केदारी यांचा अकस्मात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. बाथरुममध्ये हिटरच उकळतं पाणी अंगावर सांडल्यामुळे केदारी जवळपास ८० टक्के भाजल्या होत्या. मात्र दहा दिवसांची त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्या पुण्यातील खेड तालुक्यातील पाळू येथील शेतकरी कुटुंबातील होत्या. अश्विनी केदारींच्या मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.तीस वर्षीय अश्विनी केदारी 28 ऑगस्ट रोजी पहाटे अभ्यासासाठी उठल्या होत्या. त्यांनी आंघोळीला गरम पाणी करण्यासाठी बालदीमध्ये हिटर लावला होता. अचानक त्यांचा डोळा लागला आणि थोडा वेळाने त्यांना जाग आली. त्यावेळी पाणी चांगलंच गरम झालं होतं. हिटर बंद करुन बालदी उचलत असताना त्यातील उकळतं पाणी सांडलं आणि अश्विनीही पाय घसरुन पडल्या. अश्विनी यांना तात्काळ पिंपरी चिंचवड येथील डी वाय पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारांसाठी मोठा खर्च होत असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी आर्थिक मदतीचं आवाहन केलं होतं. अनेकांच्या पुढाकाराने त्यांना मदतही मिळाली, परंतु जवळपास दहा दिवसांपासून सुरु असलेली मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली. पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत अश्विनी केदारी यांनी राज्यातून मुलींमधून पहिलं येण्याचा बहुमान पटकावला होता. त्यांनी जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्नही पाहिले होते, त्यादृष्टीने त्यांची वाटचाल सुरु होती. मात्र नियतीच्या मनात वेगळेच काहीतरी होते. ऐन गणेशोत्सवात 28 ऑगस्ट रोजी त्यांना झालेल्या भीषण अपघातात त्यांची स्वप्नही विरुन गेली.अश्विनीच्या अचानक जाण्याने तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिचे मित्र परिवार,सहकारी,खेड तालुक्यासह स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!