गुन्हेगारांचा कर्दनकाळ एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला
1 min read
मुंबई दि.१:- मुंबईतील गँगस्टर्स, गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी ओळख असलेल्या एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांचा वर्दीतील प्रवास आता थांबला आहे. दया नायक हे गुरुवारी सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झाले. 1995 साली दया नायक मुंबई पोलीस दलात भरती झाले होते. त्यानंतर आता सुमारे 31 वर्षांच्या कारकिर्दीचा प्रवास थांबला.
दया नायक यांच्या या प्रवासात अनेकदा संघर्षमय, वादग्रस्त वळणं आली. तसेच त्यांच्या वाट्याला जेवढी प्रसिद्धी आली तेवढेच वादही आले. असं असतानाही मुंबई पोलीस दलात मात्र त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. त्यांचा धाक आजही गुन्हेगारांमध्ये आहे.
नव्वदच्या दशकात मुंबईतील गँगस्टर टोळी संपवण्यात दया नायक यांची भूमिका महत्वाची होती. दया नायक यांच्या नावावर 86 एन्काउंटर आहेत. यामध्ये दाऊद टोळीतील 22 गुंडांचा,राजन टोळीतील 20 गुंडांचा समावेश आहे.याशिवाय लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम (LTTE),
लष्कर ए तैय्यबा यासारख्या प्रतिबंधक संघटनांशी संबंधित व्यक्तींनाही नायक यांनी चकमकीत ठार मारले.अनेक महत्वाच्या गुन्ह्यांचा तपास दया नायक यानी केला होता. कंदहार विमान अपहरण प्रकरणातील दहशतवाद्यांशी संबधित तीन दहशतवाद्यांचा नायक यांनी एन्काउंटर केला होता.
आपल्या कारकीर्दीत एक हजारांहून अधिक आरोपींना अटक करणारे दया नायक रेल्वे स्फोटांच्या तपासातही सहभागी होते. दहा महिन्यांपूर्वी ते एसीपी पदासाठी पात्र ठरले होते. पण निवृत्तीच्या दोन दिवस आधी त्यांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली होती.
1990 च्या दशकात मुंबई पोलीस दलातील एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख निर्माण करणारे दया नायक हे आजही अंडरवर्ल्ड विरोधातील संघर्षाचे प्रतीक मानले जातात. त्यांनी मुंबईत 86 कुख्यात गुंडांचा एन्काउंटर केला आहे. 1995 मध्ये पोलीस अकादमीतून प्रशिक्षण पूर्ण करून.
त्यांची जुहू पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. यादरम्यान, मुंबईत अंडरवर्ल्डचा प्रभाव प्रचंड होता. डिसेंबर 1996 मध्ये त्यांनी जुहूमधील एन्काउंटरमध्ये छोटा राजनच्या दोन गुंडांचा खात्मा केला आणि यानंतर त्यांची ओळख एक एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून झाली.
