मंचर मधील ज्येष्ठ महिलेच चक्क घर चोरीला गेलंय…

1 min read

मंचर दि.१३:-मागील वर्षभर उपचारासाठी मुलीकडे गेलेल्या शकुंतला शिवाजी बागल (वय ८०) या वृद्ध महिलेला मंचरला परत आल्यावर आपले घरच गायब झाल्याचा धक्का बसला आहे. आत्तापर्यंत विहीर, पूल, रस्ता चोरीला गेल्याचे वृत्त होते, परंतु चक्क घरच चोरीला गेल्याने प्रशासन देखील बुचकळ्यात पडले आहे.या संदर्भात घर चोरीला गेल्याचे निवेदन बागल यांनी मंचर पोलीस ठाण्यात व मंचर नगरपंचायतीला दिले आहे. १९६४ पासून बागल कुटुंबीय मंचरमध्ये सव्र्व्हे नं. १७०/१८/अ, जुनी मालमत्ता क्र. १२१५ (नवीन क्र. ६/८०९), वार्ड क्र. ६ येथील घरात राहत होते. या घराला दगड, विटा, मातीचा पाया होता, पडवी व शौचालयाचीही सोय होती.पती शिवाजी मारुती बागल यांचे २०१९ निधन झाले. त्यांना पाच अपत्ये होती. यापैकी चार अपत्यांचे अकाली निधन झाले असून, सध्या अनुराधा खांडोळकर ही मुलगी आहे.ती चिखली, भोसरी येथे राहते. शकुंतला बागल दि.२५ जून २०२५ रोजी परत मंचरला आल्यानंतर, त्या जागी त्यांचे घर नव्हते.सध्या बागल ओळखीच्या लोकांकडे मंचर येथे आश्रयाला आहेत. माझं घर कुणीतरी चोरी केलंय का? की तोडून टाकलंय? मला काहीच माहिती नाही. मी फोटो व कागदपत्रं सोबत जोडली आहेत. मला न्याय मिळावा, अशी त्यांची भावनिक विनंती आहे.मंचर शहरात बांधकाम व्यावसायिकांनी अनेक गरीब कुटुंबांच्या जागा गायब केल्याची अजून काही प्रकरणे आहेत.शकुंतला बागल यांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी आंदोलन केले जाईल’. असा इशारा मंचर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी दिला आहे.घर चोरीला जात नसते. याबाबत चौकशी सुरु आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर यासंदर्भात बोलणे उचित ठरेल, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!