राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय

1 min read

मुंबई दि.१३:- अनेक दिवस रखडलेला मान्सून अखेर राज्यात सक्रिय झाला आहे. पुढील 48 तासांत मान्सून संपूर्ण विदर्भ व्यापणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. यासोबतच कोकणात अतिमुसळधार पावसाचा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार, तर मराठवाडा व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील रायगड (14 जून) आणि सिंधुदुर्ग (15 जून) येथे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील अनेक जिल्ह्यांत विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसाच्या आगमनामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.मान्सूनचा प्रवास थांबलेला असतानाही आता तो दक्षिण-पूर्व मध्य प्रदेश ते हरियाणा, तसेच आंध्र किनारपट्टीपासून ओडिशा आणि छत्तीसगड दिशेने पुढे सरकत आहे. या सर्व हवामान स्थितीमुळे मान्सूनला पूरक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळेच मुंबईसह कोकण, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे.पावसामुळे राज्यातील तापमानात लक्षणीय घट झाली आहे. तळ कोकणातला पाऊस आता जोर धरणार आहे. पुढचे 48 तास कोकणातील तीन जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही पाऊस सक्रीय झाला आहे.आजपासून पुढील तीन दिवस या भागात पावसाचा ऑरेंज आणि यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. एकंदरीत राज्यात 13 जूनपासून 17 जूनपर्यंत पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन वेळेपूर्वीच झाले. परंतु जून महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने ब्रेक घेतला. त्यामुळे शेतकरी चिंतेत आला होता.हवामान विभागाने 13 जूनपासून राज्यात मान्सून सक्रीय होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार आता राज्यात मान्सून सक्रीय झाल्याचे दिसत आहे. शुक्रवारी सकाळपासून मुंबईत ढगाळ वातावरण आहे. मुंबईतील काही भागात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी गुरुवारी रात्री देखील पाऊस झाला. पुणे शहरात गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरामध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली. या पावसामुळे पुण्यासह पिंपरी चिंचवड परिसरातील सखल भागात पाणी साचले. शुक्रवारी सकाळीसुद्धा पावसाचे वातावरण आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे