एसटी महामंडळ वर्षाला ५००० बसेसची खरेदी करणार; परिवहनमंत्री सरनाईक यांची माहिती
1 min read
पुणे दि.११:- राज्य सरकारचे ई-वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण एसटी महामंडळाने अंगीकारले आहे. दरवर्षी एसटी महामंडळ पाच हजार नवीन बस खरेदी करणार असून, त्यापैकी किमान एक हजार बस या स्मार्ट ई-बस घेण्यात येणार आहेत. या सर्व बस एसटी महामंडळाच्या स्वमालकीच्या असतील, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.पुण्यातील एका कंपनीने उत्तर प्रदेश परिवहन महामंडळासाठी तयार केलेल्या स्मार्ट ई-बसचे सादरीकरण सरनाईक यांच्यासमोर करण्यात आले. त्यानंतर माध्यमांसोबत त्यांनी संवाद साधला.
तसेच, या ई-बस ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली बसवलेल्या असाव्यात. स्वारगेट घटनेच्या पार्श्वभूमीवर, बाहेरील व्यक्ती बसमध्ये सहजपणे प्रवेश करू शकणार नाहीत, अशी यंत्रणा बसमध्ये असावी, यावर त्यांनी भर दिला.
आग किंवा इतर घटना घडल्यास तातडीने प्रतिसाद देणारी यंत्रणा बसमध्ये असणे आवश्यक आहे, अशा सूचना त्यांनी संबंधित बस तयार करणाऱ्या कंपनीला दिल्या.एसटी महामंडळाला सध्या ११ हजार कोटींचा संचित तोटा आहे. एसटी महामंडळाची लवकरच श्वेतपत्रिका काढणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
जुन्या चुका सुधारून नव्या पद्धतीने काम सुरू केले जाईल, मात्र या सुधारणा लगेच न होता, पुढील अडीच वर्षांत हळूहळू होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार परिवहन खात्याला सढळ हाताने निधी देत असून, २०२९ पर्यंत २५ हजार नवीन बस आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
गेल्या चार वर्षात एसटी महामंडळात नव्याने बस खरेदी केलेल्या नाहीत. सध्या साडेचौदा हजार बस ताफ्यात आहेत. हा ताफा वाढविण्यात येत आहे. त्यासाठी वर्षाला पाच हजार नवीन बस घेण्याचे नियोजन असून, त्यापैकी एक हजार बस इलेक्ट्रिक असाव्यात, असे माझे मत आहे.
पुढील १० वर्षांत जुन्या बस टप्प्याटप्प्याने बंद करून नवीन अधिक सुरक्षित बस आणल्या जातील. सध्या २ हजार ६१० नवीन बस रस्त्यावर येणार असून, त्यापैकी १५०० बस एसटीच्या ताफ्यात दाखल झालेल्या आहेत. भविष्यात ज्या ठिकाणी बससेवा नाही, तिथेही पोचण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
सर्व एसटी बस आणि डेपोचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून, दोन महिन्यांत हे काम सुरू होईल. यात सुरक्षा आणि स्वच्छतेला प्राधान्य दिले जाईल, असेही सरनाईक यांनी सांगितले. एसटी महामंडळाकडून या पुढील काळात बस खरेदी करताना त्या स्वमालकीच्या असतील. कोणतीही बस भाडेतत्त्वावर घेतली जाणार नाही.
भाडेतत्त्वावरील बसच्या माध्यमातून त्यांचेच भले होते. त्यामुळे माझ्या काळात तरी एकही बस भाडेतत्त्वार घेणार नसल्याचे सरनाईक यांनी सांगितले; तसेच उच्च सुरक्षा पाटी (एचएसआरपी) बसवण्यासंदर्भात वाहनचालकांना काही त्रास होत असल्यास त्यांनी तक्रार करावी. त्या संदर्भात कारवाई केली जाईल, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.