ओतूर येथील बाबाजी चैतन्य महाराज पालखीचे १४ जूनला प्रस्थान
1 min read
ओतूर दि.९:- जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज पायी पालखी सोहळ्याचे प्रस्थान श्री क्षेत्र ओतूर येथून शनिवारी (दि. १४) होणार आहे, अशी माहिती पालखी सोहळ्याचे सचिव अनिल तांबे, अध्यक्ष आत्माराम गाढवे आणि व्यवस्थापक शांताराम महाराज वाकर यांनी दिली आहे.चैतन्य महाराज पंढरपूर पायी वारी पालखी सोहळ्याचे हे ६५ वे वर्ष आहे. २ जुलैला पालखी सोहळ्याचा प्रवेश श्री क्षेत्र पंढरपूर मध्ये होणार आहे. ओतूर येथे नुकताच संत तुकाराम महाराज यांचा भव्यदिव्य त्रिशतकोत्तर वैकुंठगमन सप्ताह सांगता सोहळा पार पडला आहे.
त्यामुळे यावर्षी पायी वारीसाठी भाविकांच्या संख्येत वाढ होणार असल्याची माहिती शांताराम महाराज वाकर यांनी दिली आहे. बाबाजी चैतन्य महाराज यांचा पालखी सोहळा पारनेर, श्रीगोंदा, सिध्दटेक, टेंभुर्णी, आष्टीमार्गे पंढरपूरला जाणार आहे. तर परतीचा प्रवास नातेपुते, फलटण, लोणंद, सासवड, आळंदी ते ओतूर असा होणार आहे.
जाताना प्रवास १९ दिवस, तर येतानाचा प्रवास १६ दिवसांचा असणार आहे. बाबाजी चैतन्य महाराज पालखी सोहळ्याच्या मुक्कामासाठी पंढरपूर येथे बोराटे मळ्यात १५ गुंठे जागा घेतली. या जागेत भाविकांसाठी सोयी करून देण्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले.