मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल; १२ दिवस आधीच मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन
1 min read
मुंबई दि.२५:- मान्सून काल केरळात दाखल झाला होता. त्यानंतर तो गोव्यात दाखल झाला. मान्सून महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी एक ते दोन दिवस जातील, असा अंदाज होता. मात्र, महाराष्ट्रात मान्सूनसाठी अत्यंत पोषक स्थिती असल्याने अवघ्या काही तासांमध्ये मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मान्सून तळकोकणात दाखल झाला असून वेळेपूर्वीच मान्सून दाखल झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आनंदाचं वातावरण आहे.दरवर्षी मान्सून साधारणपणे ७ जूनच्या आसपास राज्यात दाखल होतो. मात्र, यंदा मान्सून १२ दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे.
मान्सूनची एकूण आगेकूच पाहता पुढील काही तासांमध्ये मान्सून मुंबई आणि पुण्यात दाखल होईल, असा अंदाज आहे. आज सकाळपासून मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरात ढगाळ वातावरण आहे. गोव्यात मुसळधार पाऊस कोसळत असून गोव्यातील रस्त्यांना नदीचं स्वरूप आले आहे.
गोव्यात मुसळधार पाऊस कोसळत असून गोव्याला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गोवा म्हापसा येथे घरामध्ये, बाजारपेठेत पावसाचे पाणी गेल. गोव्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. रस्ते जलमय झाले आहेत.हवामान खात्याने मुंबई आणि ठाण्याला रविवारी यलो अलर्ट दिला आहे.
तर रायगडला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून तळकोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे. वादळी वाऱ्यामुळे तळकोकणात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. मान्सूनचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यातील बहुतांश शेतकरी हे खरिपाच्या शेतीसाठी मान्सूनच्या पावसावर अवलंबून असतात. त्यामुळे मान्सूनच्या आगमानाने शेतकरी सुखावले आहेत. तसेच मान्सून आल्याने गेल्या दोन-तीन महिन्यांपासून उकाड्याचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांनीही सुटकेचा निश्वास टाकला आहे.