देशभरात २५७ कोरोना रुग्ण; मुंबईत ९५ रुग्णांची नोंद; आरोग्य यंत्रणा सतर्क
1 min read
मुंबई दि.२२:- कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेननं आरोग्य यंत्रणेचं टेन्शन वाढवलंय. कारण देशभरात आतापर्यंत २५७ लोक बाधित झाले आहेत. राजधानी दिल्लीसह ११ राज्यात पुन्हा कोरोना रूग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात तर कोरोना रुग्णसंख्येने शंभरी गाठली आहे. त्यामुळे देशभरातील आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत.मुंबईत ४ महिन्याच्या एका बाळाला कोविडची लागण झालीय. के.जे. सोमय्या रुग्णालयात बाळावर उपचार सुरु आहेत. तर १६ रुग्णांवर सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातही तिघांना कोरोनाची लागण झालीय. यातील एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आलाय.
दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यातही एका ४० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. यावेळी कोविड JN1 चा नवीन व्हेरिएंट आला आहे. आशीयाई देशांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे.
जुन्या ओमिक्रॉन प्रकारांपेक्षा हा व्हायरस जास्त गंभीर आजार निर्माण करतोय का याचा अद्याप कोणताही ठोस पुरावा मिळाला नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलंय.
त्यामुळे सध्यातरी योग्य़ ती दक्षता घेणे आणि आरोग्य यंत्रणेच्या सुचनांचं पालन करणे एव्हढंच आपल्या हाती आहे. पूर्वीच्या लसीकरणामुळे आणि मागील संसर्गातून वाचल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती आता थोडी मजबूत झाली आहे. कोरोना आता पूर्वीसारखी विनाशकारी शक्ती राहिलेली नाही.
बहुतेक संसर्ग सौम्य असले तरी, वृद्ध आणि आजार असलेल्यांना धोका असल्याचा असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. “जेव्हा रुग्णसंख्या वाढते तेव्हा नेहमीपेक्षा जास्त खबरदारी घेणं महत्वाचं आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणं उपयुक्त ठरेल. ज्यांना ताप आहे त्यांनी घरीच राहावं आणि इतरांशी भेटणं टाळावं” असा सल्ला डॉ. जयदेवन यांनी दिला आहे.