मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह ५४ जणांवर गुन्हा दाखल
1 min read
अहिल्यानगर दि.३०:- राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या सहकारी साखर कारखान्यात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. विखेंच्या साखर कारखान्यात नऊ कोटी बोगस कर्जमाफी प्रकरणी संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्यासह ५४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रवरानगरच्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने सभासद शेतकऱ्यांच्या नावे दोन बँकांकडून नऊ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते.
या बोगस कर्ज प्रकरणी बाळासाहेब केरूणात विखे पाटील व दादासाहेब पवार यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान, राहता न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळावर गुन्हा दाखल करून संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.
सर्वोच्च न्यायालयाने पोलीस प्रशासनाला प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी राहता यांना कार्यवाही करण्याचे व ८ आठवड्यांच्या आत तपास पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता मंत्री विखेंसह ५४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.