उन्हाळ्यात तरी तो गाळ काढला जाईल का?:- प्रशांत पाबळे
1 min read
वडज दि.७:- कुकडी प्रकल्पातील महत्त्वाची असे वडज धरण 1980 साली बांधकाम पूर्ण झाले. एक टीएमसी क्षमता असलेलं धरण आज गाळामुळे अर्धे सुद्धा राहिले नाही. नैसर्गिक कुठल्याही धरणाचा कालावधी हा पन्नास वर्षाचा असतो. त्यामुळे या उन्हाळ्यात तरी तो गाळ काढला जाईल अशी अपेक्षा मीना खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या वतीने भारतीय किसान संघ करत आहे. धरणातलं बरच पाणी खाली जाते. तसेच धरणावर पिण्याच्या पाण्यासाठी बारव, येणेरे, पारुंडे, तसेच सावरगाव अशी अनेक छोटी मोठी दीडशे च्या वर गावे अवलंबून आहेत.
तसेच प्रस्तावित वडज उपसा सिंचन योजना सुद्धा याच धरणातून करण्यात येणार आहे. या सगळ्याचा विचार करता वडज धरणांमधून तात्काळ गाळ काढणे गरजेचे आहे. भविष्यातील पाण्याची गरज ओळखता अनेक स्वयंसेवी संस्था यासाठी आग्रही व मदत करण्यास तयार आहेत.
मात्र सरकार दरबारी कुठल्याही प्रकारची हालचाल होत नाही. अनेक वेळा अधिकाऱ्यांना कॉल करून सुद्धा कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. आजूबाजूचे डोंगर पोखरून रस्ते बनवण्यापेक्षा धरणातील माती वापरून रस्ते तसेच शेती यासाठी वापर होऊ शकतो…
त्यामुळे वडज धरणातील गाळ लवकरात लवकर काढावा अशी मागणी भारतीय किसान संघाचे युवा अध्यक्ष प्रशांत पाबळे यांनी केली आहे.