शेतकऱ्याने कमी पाण्यात फुलवला संत्र्याचा मळा; वर्षाला मिळवला १० लाखांचा निव्वळ नफा

1 min read

अहिल्यानगर दि.७:- पारंपारिक शेतीला फाटा देत शेतकरी आता आधुनिक आणि नगदी पीक देणार्‍या शेतीकडे वळाले आहेत. कमी पाणी उपलब्ध असलं तरी चांगलं नियोजन केलं तर चांगल्या उत्पन्नाची पीक घेता येऊ शकतात, याचं उत्तम उदाहरण अहिल्यानगरच्या भोसे येथील अशोक टेमकर यांनी दाखवून दिले आहे. टेमकर हे संत्रा बागेच्या शेतीतून चांगलं उत्पन्न मिळवत आहेत. अडीच एकर वरील संत्रा बाग त्यांना वर्षाला दहा लाख रुपयांचा निव्वळ नफा देत आहे. त्याची पंचक्रोशीत एकच चर्चा होत आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील हे आहे भोसेगाव या परिसरात 350 ते 400 मिली पाऊस पडतो. कमी पाऊस असल्यामुळे या भागातील शेतकरी पारंपारिक खरीपाची पिके घेतात. मात्र मागील काही वर्षांपासून भोसे गावातील शेतकरी फळबागांकडे वळले आहेत. प्रत्येक शेतकर्‍याकडे छोटी-मोठी फळबाग आहे. यात डाळिंब आणि संत्रा बाग या भागात जास्त पाहायला मिळते. अशोक टेमकर यांना 16 एकर शेती आहे. यातील अडीच एकरवर त्यांनी 750 संत्र्यांची झाड लावली आहेत. बारा बाय बारा अंतरावर असलेल्या या संत्रा झाडांना सरासरी 40 ते 60 किलो संत्र्याचे उत्पन्न मिळत आहे. एक वेळेस पीक घेण्यासाठी साधारण अडीच ते तीन लाख रुपयापर्यंत खर्चही येतो. यावर्षी संत्रा बागेतून त्यांना दहा लाख रूपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे.परिसरात बागांची संख्या वाढल्यामुळे गावातच व्यापारी देखील तयार झाले आहेत त्या परिसरातील बागांमध्ये मिळणारी फळ दर्जेदार असल्यामुळे त्यांना चांगली मागणी ही आहे. मुंबई दिल्ली या बाजारासोबतच दक्षिणेकडील बाजारातही या भागातील फळांना मागणी असते. सध्या चांगला भाव असल्यामुळे व्यापार्‍यांना देखील चांगला नफा मिळत आहे. पारंपारिक शेती करणाऱ्या शेतकर्‍यांना पिकांसाठी खर्च केलेले पैसेही मिळणं अवघड होतं आहे. आशात आधुनिक शेतीची कास धरत आपल्याकडे असलेल्या साधनसामग्रीच्या जोरावर चांगली पिके घेता येऊ शकतात आणि चांगलं उत्पन्नही मिळवता येतं. थोडं पाणी उपलब्ध असलेल्या शेतकर्‍यांनी आता फळबागांकडे वळल्यास त्यांचा फायदा होईल यात शंका नाही.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे