बेल्ह्यात ग्रामदैवत श्री कालभैरवनाथ यात्रेनिमित्त शर्यतीत धावले ४०४ बैलगाडे

1 min read

आणे दि.२५:- जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या बेल्हे येथील ग्रामदैवत श्री कालभैरव नाथांची यात्रा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात संपन्न झाली असुन यावेळी हरिनाम सप्ताहाचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष व मंदिर कलशारोहण प्रथम वर्धापन दिन सोहळा मोठ्या आनंदात संपन्न करण्यात आला.यावेळी दोन दिवस चालणाऱ्या बैलगाडा घाटामध्ये एकूण ४०४ बैलगाडे धावले असून, बैलगाडा शर्यतीच्या शौकिनांनी मोठी गर्दी केली होती.यंदाच्या हरिनाम सप्ताहाच्या रौप्य महोत्सवी २५ व्या वर्षानिमित्ताने ह.भ.प.उमेश महाराज दशरथे, अनिल महाराज पाटील, तुकाराम महाराज मुंढे, वैभव महाराज राक्षे, संजयनाना महाराज धोंडगे, ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली), पांडुरंग महाराज घुले, यांच्यासह जयवंत महाराज बोधले यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले. दररोज कीर्तनानंतर दानशूर अन्नदात्यांकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार (दि.२१) रोजी श्रींच्या पालखीची भव्य मिरवणूक शोभेच्या दारूकामासह पार पडली. या रोप्य महोत्सवी हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन व नियोजन पाराजी बोरचटे, प्रदीप पिंगट, सुभाष भुजबळ, अमर गुंजाळ, शंकर शिंदे, नंदू गुळवे, राजेंद्र बोऱ्हाडे यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी केले.शनिवार (दि.२२) रोजी बैलगाडा शर्यतीच्या पहिल्या दिवसाचे उद्घाटन जुन्नर तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र चौधर, आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, उपनिरीक्षक अमोल पन्हाळकर, सरपंच मनीषा डावखर, माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, अशोक घोडके, नंदू पिंगट, उपसरपंच राजेंद्र पिंगट, रमेश पिंगट यांच्या हस्ते करण्यात आले.शनिवार व रविवार (दि.२२ व २३) रोजी श्री काळभैरवनाथ यात्रेनिमित्त भव्य अशा बैलगाड्यांच्या शर्यतीचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोन दिवस चालणाऱ्या बैलगाडा घाटामध्ये एकूण ४०४ बैलगाडे धावले असून, बैलगाडा शर्यतीच्या शौकिनांनी मोठी गर्दी केली होती. दोन दिवस चालणाऱ्या यात्रेमध्ये हॉटेल, रसवंती, थंडपेये व इतरही अनेक दुकानांची मोठी रेलचेल होती व त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.

श्रीभैरवनाथ केसरी २०२५ बैलगाडा शर्यतीच्या पहिल्या दिवशी घाटात १९७ बैलगाडे धावले असून, दोन दिवस चालणाऱ्या बैलगाडा शर्यतीमध्ये यावेळी बेल्हे बैलगाडा घाटाचा महाराजा गुळुंजवाडी येथील विष्णू बाळू पवार यांचा गाडा मानकरी ठरला असून, पहिल्यात पहिला बैलगाडा मान प्रितेश पवार (महाराजा ग्रुप )यांना मिळाला. तर पहिल्या दिवशी घाटाचा राजा हा मान पेमदरा येथील नवनाथ दाते यांच्या बैलगाड्याने पटकावला. तसेच पहिल्या दिवशीची प्रथम क्रमांकाची फायनल बारी अहिल्यानगर जिल्ह्यातील कळस येथील सुभाष गलांडे यांच्या बैलगाड्याची ठरली.यात्रोत्सवनिमित्त दोन दिवस आयोजित बैलगाडा शर्यतीत ४०४ बैलगाडे धावले. यंदाच्या बेल्हे बैलगाडा घाटाचा महाराजा मानकरी विष्णू बाळू पवार यांचा बैलगाडा ठरला. बेल्हे येथे भैरवनाथ केसरी २०२५ बैलगाडा शर्यतीच्या पहिल्या दिवशी घाटात १९७ नामांकित बैलगाडे धावले. रविवार (दि.२३) रोजी झालेल्या दुसऱ्या दिवशीच्या बैलगाडा शर्यतीमध्ये एकूण २०७ बैलगाडे धावले असून. त्यामध्ये पहिल्यात पहिला फळीफोड बैलगाडा अहिल्यानगर जिल्ह्यातील सावरगाव येथील संकेत बाळासाहेब चिकणे यांचा ठरला असून, दुसऱ्या दिवशीचा घाटाचा राजाचा मान गुळुंजवाडी, (ता. जुन्नर) येथील विष्णू बाळू पवार यांच्या बैलगाड्याने मिळवला असून, दुसऱ्या दिवशीची प्रथम क्रमांकाची फायनल बारी बेल्हे येथील जानकु मुक्ताजी डावखर व कृष्णा विजय मेंगाळ यांच्या बैलगाड्याची ठरली.

दोन दिवस झालेल्या भैरवनाथ केसरी २०२५ बैलगाडा शर्यती यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी अशोक घोडके, जानकु डावखर, स्वप्निल भंडारी, सुरेश गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्या ग्रुप, उमाजी नाईक मित्रमंडळ, एकवीरा ग्रुप, बैलगाडा संघटनेच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. दरम्यान या बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी बेल्हेसह जुन्नर, पारनेर, संगमनेर, शिरूर, आंबेगाव व इतर तालुक्यातुनही मोठ्या संख्येने बैलगाडा शर्यत शौकिनांनी मोठी गर्दी केली होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे