ग्रामीण भागातील यात्रांना सुरुवात; बैलगाडा शर्यतीच्या बैलांना मागणी वाढली; बेल्हे बाजारात ९९ टक्के बैलांची विक्री
1 min read
बेल्हे दि.१२:- ग्रामीण भागात गावोगावी यात्रांना सुरुवात झाली असून यात्रांमध्ये बैलगाडा शर्यती मोठ्या प्रमाणात होतात. महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या बेल्हे बैल बाजारात बैलांची विक्री तसेच खरेदीचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून बाजारात विक्रीसाठी आलेल्या बैलांपैकी ९५ ते ९९ टक्के बैलांची विक्री होत आहे.
राज्यात प्रसिद्ध असलेल्या बेल्हे आठवडे बैल बाजारात दर सोमवारी मध्य प्रदेश, कर्नाटक, केरळ, गुजरात राज्यातील विविध जिल्ह्यांमधून बैल खरेदी- विक्रीसाठी व्यापारी व शेतकरी येतात. सध्या बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या बैलांचे प्रमाण वाढले असून सोमवार दि.१० रोजी भरलेल्या बाजारात ६१५ बैल विक्रीसाठी आले होते. त्यापैकी ६०९ बैलांची विक्री झाली. सध्या बैल जोडीला ७० ते १ लाख रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे बैलांची खरेदी करण्याचे प्रमाण ९९ टक्के झाले आहे.जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून बेल्हे येथे गेल्या अनेक वर्षांपासून ८ ते १० एकर क्षेत्रामध्ये दर सोमवारी बैलांचा बाजार भरतो.
या बाजारामध्ये खिलार, म्हैसूर, गावठी आदी जातीचे बैल विक्रीला येतात.राज्यातील पाथर्डी, जामखेड, श्रीगोंदा, काष्टी, नाशिक, जालना, चाळीसगाव, मालेगाव आधी ठिकाणातून बैल जोड्या विक्रीसाठी येतात व शेतकरी, व्यापारी खरेदीसाठी येतात.शेतकरी आणि व्यापारी आदल्या दिवशी या ठिकाणी बैल विक्रीला घेऊन येतात.
जेवणाची व्यवस्था असल्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांची चांगली सोय होते. बेल्ह्याच्या बैलबाजारामध्ये खरेदी-विक्रीसाठी बैलांसह म्हशींची, शेळ्या, बोकड, खरेदी-विक्री होते. बैलगाड्यासाठी लागणारे साहित्यही विक्रीसाठी असते. बाजारामध्ये खात्रीशीर बैल मिळत असल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करताना पाहायला मिळतात.
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून बेल्हे येथील बाजारात येणाऱ्या व्यापारी आणि शेतकऱ्यांची योग्य पद्धतीने काळजी घेतली जाते. बैल विक्रीमधून व्यापारी किंवा शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, याचीही काळजी बाजार समिती घेत असते असे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, संचालक प्रीतम काळे यांनी सांगितले.