जुन्नर तालुक्यात कांदारोपाला दुप्पट भाव

1 min read

जुन्नर दि.१३:- जुन्नर तालुक्यात कांदा आगार म्हणून ओळखला जातो. सद्या तालुक्यातून शेतकऱ्यांकडून बाजारात येणाऱ्या कांद्याची आवक दरवर्षीच्या तुलनेत घटली आहे. त्यामुळे जुन्नर, ओतूर, आळेफाटा बाजार समितीत कांदा प्रतिकिलो ६० ते ७० रुपये दराने विकला जात आहे. तर कांद्याच्या रोपाला कांद्यापेक्षा अधिक भाव आला असून एक एकर कांदा लागवड करण्यासाठी रोपासाठी १७ ते २० हजार रुपये मोजावे लागत आहेत. तर गतवर्षी हेच रोप ८ ते १० हजार रुपयांना मिळत होते. कांद्यापेक्षा रोपाला अधिक भाव आल्याने यंदा कांद्याची लागवड महागडी असली तरीही कांदा लागवडीसाठी शेतक-यांची लगबग सुरू आहे.रब्बी हंगाम कांदा पिकासाठी अधिक पोषक असल्याने दर्जेदार उत्पादन जुन्नर तालुक्यात घेतले जाते.दिवाळीनंतर आणे पठार,निमगाव सावा,साकोरी,बेल्हे राजुरी,गुंजाळवाडी, मंगरूळ, बोरी, जाधववाडी आदी गावांसह परिसरातील शेतकरी कांदा लागवडीसाठी अधिक उत्सुक असतात. निवडणुकीत सध्या मजूर मिळत नसले तरी कुठूनही मजूर आणून रब्बी हंगामातील कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. आणे पठारावर ६० ते ७० टक्के कांदा लागवड पूर्ण झाली आहे.रोपाची मागणी वाढल्याने यावर्षी तालुक्यात परिसरात ६० ते ७० टक्के कांद्याची लागवड होईल, असा अंदाज आहे. सध्या परिसरातील शेतकऱ्यांकडील उन्हाळी कांदा लागवड सुरू आहे. शेतकरी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात नवीन कांद्याची लागवड करतात. काही भागात लागवड चालू आहे तर काही भागात या महिनाभरात लागवड सुरू होणार आहे. अल्पभूधारक शेतकरी कांद्याच्या बियाणांपासून रोपे तयार करतात.रोपांची लागवडी योग्य वाढ झाली की ते विक्रीही असेल त्या बाजारभावाने करतात.कांद्याचे बी १५०० ते १८०० रुपये किलो तर ४५०० ते ५००० रुपये पायली प्रामाणिक शेतकऱ्यांना घ्यावी लागत आहे.विशेष करुन तालुक्याच्या पुर्व भागातील राजुरी, जाधववाडी, बोरी, साळवाडी भोरवाडी, शिरोली, सुलतानपुर, वडगाव, कांदळी, चाळकवाडी, उंचखडक या गावांमध्ये मोठया प्रमाणात कांद्याच्या लागवडी होत असतात. याही वर्षी लागवडीला सुरवात झालेली आहे. परंतु बहुतेक शेतकरी बेड पध्दतीने लागवडी करताना दिसुन येत आहे कारण बेड पध्दतीने लागवडी केल्यास पिकाला पाणी पण कमी द्यावे लागते व ते भरावे पण लागत नाही. याला फक्त ठिबक सिंचनचा वापर करावा लागतो. शिवाय कमी व प्रमाणात पाणी दिल्याने कांदा देखील चांगला येतो आहे. तर सारा पध्दतीने लागवड केल्यास सा-यात जास्त पाणी साचल्याने कांदा फुगतही नाही व जास्त पाण्यामुळे कांदेही खराब होतात यामुळे शेतकऱ्यांचा बेड पध्दतीने लागवड करण्याकडे कल वाढला आहे.गेल्या दिड दोन महीण्यांपासुन वातावरणात होणाऱ्या हवामानामुळे व पावसामुळे शेतकऱ्यांनी टाकलेली कांद्याची रोपे सडुन आहेत तर काही खराब झाली आहेत. त्यामुळे कांद्यांच्या रोपांंचे भाव देखील गगणाला भिडले आहे.

प्रतिक्रिया

“मागे आठ-दहा दिवस पडणाऱ्या सततच्या पावसामुळे व बदलत्या हवामानामुळे रोपे सुडून गेली. त्यामुळे बाजारभाव कडाडले आहेत.”

महेंद्र बांगर, शेतकरी बांगरवाडी

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे