ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल?

1 min read

पुणे दि.१३:- मराठीच्या मुद्द्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्यातील सर्व मतभेद विसरून एकत्र आले होते. त्यानंतर मनसे आणि ठाकरे गटामधील युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. तसेच मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आल्यास मनसेचा महाविकास आघाडीत समावेश होणार का? याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मोठं विधान केलं आहे.पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवासी कार्यशाळेत रमेश चेन्नीथला यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर चेन्नीथला म्हणाले, दोन्ही भाऊ एकत्र येत असतील, तर आम्हाला त्यात कोणतीही अडचण नाही. आगामी निवडणुकीत त्यांच्यात युती होईल की नाही, हे आम्हाला माहीत नाही. मात्र, त्यांच्या एकत्र येण्याला आमचा विरोध नाही. या वक्तव्यमुळे ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा हिरवा कंदील मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.चेन्नीथला यांनी पुढे स्पष्ट केले की, राज ठाकरे हे महाविकास आघाडीचा (एमव्हीए) भाग नाहीत. “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युतीबाबत कोणतीही चर्चा झाली असेल, तर ती आमच्या माहितीत नाही. पण दोन्ही नेते एकत्र येत असतील, तर आम्हाला त्यात काही हरकत नाही. मात्र, अंतिम निर्णय चर्चेतून घेतला जाईल. याशिवाय, त्यांनी महाविकास आघाडीच्या भवितव्यावरही भाष्य केले आणि आघाडीच्या भविष्यातील दिशा ठरवण्यासाठी काँग्रेस पक्ष विचारमंथन करत असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. दरम्यान, या कार्यशाळेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. “आता फक्त अ‍ॅक्शन, अ‍ॅक्शन आणि अ‍ॅक्शन,” असा मंत्र देत त्यांनी आगामी निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले की, आगामी निवडणुकीत काँग्रेस महाराष्ट्रातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास येईल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!