कितीही टार्गेट केले तरी ओबीसींच्या हक्कासाठी मी लढतच राहणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य
1 min read
पणजी दि.८:- माझ्यावर ओबीसी समाजाबद्दल बोललो म्हणून टीका केली जाते, पण मी कुठल्याही एका समाजाबद्दल बोलत नाही. मला कितीही टार्गेट केले तरी ओबीसी समाजाच्या हक्कासाठी मी लढतच राहणार आहे. एका समाजासाठी आवाज उठवला म्हणजे दुसऱ्या समाजाच्या विरोधात बोलतो आहे असं म्हटलं जातं.
पण माझं धोरण तसं नाही. जोपर्यंत ओबीसी समाज प्रगतीच्या मुख्य प्रवाहात येत नाही, तोपर्यंत प्रगत भारताचे स्वप्न पूर्ण होणार नाही, असं वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
गोव्यात आयोजित केलेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या 10व्या राष्ट्रीय महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. या अधिवेशनासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, प्राध्यापक डॉ. बबनराव तायवाडे, आमदार परिणय फुके,
माजी मंत्री विजय वड्डेटीवर, माजी मंत्री महादेव जानकर, आमदर किसन कथोरे, आमदार अभिजीत वंजारी आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनानंतर मनोगत व्यक्त करताना फडणवीस म्हणाले, ‘आज इथे ७६ मागण्या मांडण्यात आल्या आहेत. त्यापैकी २४ मागण्या केंद्राकडे करण्यात आल्या आहेत.
त्या आपण केंद्राकडे पाठवू. २५ ते २६ मागण्या महाराष्ट्राकडे तर बाकीच्या मागण्या गोवा सरकारकडे करण्यात आल्या आहेत. मागण्यांवर आपण काम करु. काही झालं तरीही ओबीसी समाजासाठी काम करणारच, असा पुनरुच्चार फडणवीस यांनी केला.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही या कार्क्रमादरम्यान आपले विचार मांडले. ‘ओबीसींनी सादर केलेल्या रिप्रेझेंटेशनवर महाराष्ट्र, गोव्यासह केंद्र सरकार विचाराधीन असून ओबीसींना न्याय, हक्क आणि आरक्षण मिळालेच पाहिजे,’ असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.
मंडळ आयोगापासून आजपर्यंत आपल्या हक्कांसाठी ओबीसी समाज लढत आहे. भाजपा सरकार ओबींसींच्या हक्कासाठी तत्पर असून सरकारद्वारा ओबीसी समाजासाठी चांगले निर्णय घेण्यात आले आहेत.
मागील काही वर्षात ओबीसींच्या नावावर फक्त राजकारण करण्यात आले. समाजाचा वापर करून काहींनी फक्त पदे उपभोगली. मात्र ओबीसींना न्याय आणि घटनात्मक हक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
