नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; बेछूट गोळीबार; भारतीय सैन्याचे चोख प्रत्युत्तर

1 min read

श्रीनगर दि.६:- भारत-पाकिस्तान सीमेवरून मोठी बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील पूंछ येथील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. पूंछच्या कृष्णा खोऱ्यात पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला आहे. मे मध्ये झालेल्या शस्त्रसंधीचे हे उल्लंघन आहे. भारतीय सैन्यानेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या नियंत्रण रेषेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.भारताचे ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरु आहे. सोमवारी कुलगाम परिसरात झालेल्या चकमकीत लष्कराच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले. या परिसरात आणखी काही दहशतवादी लपले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शोध मोहीम अजूनही सुरू आहे. याच काळात पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. याआधी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला करत 26 पर्यटकांचा बळी घेतला होती.याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवले होते. त्यावेळी दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले करण्यात आले होते. पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीबाबत भारतीय सैन्यानेही माहिती दिली आहे. भारतीय सैन्याच्या 04 -जेएके रायफल्सने म्हटले की, पाकिस्तानी सैन्याच्या 801 मजहादीन पोस्ट, एलपी-1 ने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आणि 04-जेएके रायफल्सच्या भारतीय सैन्य पोस्ट लहान शस्त्रांनी 12/15 राउंड गोळीबार केला. यानंतर भारतीय सैन्यानेही प्रत्युत्तर दिले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून होणारा हा पहिलाच गोळीबार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!