यापुढे एकही चूक खपवून घेणार नाही; ही शेवटची संधी म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांना दिली तंबी

1 min read

मुंबई दि.३०:- राज्यातील महायुतीच्या काही मंत्र्यांच्या वादग्रस्त विधान आणि कृतीमुळे गेल्या काही दिवसांपासून सरकारची बदनामी होत आहे. या सर्व घटनानंतर आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सर्व मंत्र्यांची चांगलीच शाळा घेतली. २० मिनिटं त्यांनी या मंत्र्यांचा क्लास घेतला. आणि आता एकही चूक खपवून घेणार नाही, असं त्यांनी मंत्र्यांना स्पष्टपणे सांगत चांगलीच कानउघडणी केली. दरम्यान, मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २० मिनिटे सर्वच मंत्र्यांना काही सूचना केल्या. यात वादग्रस्त विधाने, कृती अजिबात खपवून घेतली जाणार नाही. तसेच असेच प्रकार होत राहिले तर सरकारची बदनामी होते. त्यामुळे ही शेवटची संधी आहे. यानंतर काय कारवाई करायची ती करूच,पण पुढे एकही प्रकार खपवून घेणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना वाँर्निंग दिली. तसेच त्यांनी सर्व मंत्र्यांवर नाराजी देखील व्यक्त केली आहे. जरा कमी बोलायला शिका, जितके कमी बोलाल तितके चांगलं आहे असा मोलाचा सल्लाही या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. शिवाय या पुढेही तुम्ही असेच वादग्रस्त वक्तव्य करत राहीलात तर दरवेळी तुम्हाला कुणी वाचवणार नाही, असा सज्ज्ड दमही त्यांनी यावेळी दिल्याचे समजते.गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारचे मंत्री वादात सापडले आहेत. यापैकी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे प्रकरण सर्वाधिक गाजले. विधिमंडळात कायदा आणि सुव्यवस्था, राज्याचा विकास याबाबत महत्त्वाचे कायदे केले जातात. याच विधिमंडळाच्या सभागृहात माणिकराव कोकाटे ऑनलाईन रमीचा जुगार खेळताना दिसले. त्यांचे गेम खेळत असतानाचे काही व्हिडीओ समोर आले. त्यानंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. याआधाही कोकाटे यांनी काही वादग्रस्त विधानं केली होती. रमी गेम खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी राज्य सरकार भिकारी आहे, असेही एक विधान केले. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या बेडरुममध्ये पैशांनी भरलेली कथित बॅग असल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. या सर्वच घडामोडींमुळे फडणवीसांनी आपल्या मंत्र्यांना तंबी दिली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!