‘एआय’ तंत्रज्ञान शेतीसाठी ‘गेम चेंजर’ ठरणार; शासनाची ५०० कोटी रुपयांची तरतूद
1 min read
अहिल्यानगर दि.१३:- राज्यातील दहा हजार शेतकऱ्यांच्या शेतात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यात येणार आहे. हे तंत्रज्ञान शेतीसाठी ‘गेम चेंजर’ ठरेल. त्यातून कृषी अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. राज्य सरकारने ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व राज्यातील सहकारी साखर कारखानेही मदत करणार असल्याची माहिती देशाचे माजी कृषिमंत्री तथा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली. श्रीरामपूर येथे रयत शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष स्व. ॲड. रावसाहेब शिंदे जयंती तसेच
संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ‘रयत’चे पदाधिकारी रामशेठ ठाकूर, खासदार नीलेश लंके, चंद्रकांत दळवी, एमकेसीएलचे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत, अविनाश आदिक, भगीरथ शिंदे, दादा कळमकर,
मीनाताई जगधने, अरुण कडू, रावसाहेब म्हस्के, भागचंद चुडीवाल, राम भोगले, संदीप वर्पे आदी उपस्थित होते.शरद पवार म्हणाले, स्व. अण्णासाहेब शिंदे व आपण केंद्रीय कृषिमंत्री असताना शेती क्षेत्रात अनेक संशोधने झाली. इंडियन कौन्सिल ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन रिसर्च केंद्रात ५ हजार संशोधक काम करतात.
राजस्थानमध्ये उंटाबाबत संशोधन केले जाते. आपण कृषिमंत्री असताना ॲड. अण्णासाहेब शिंदे यांच्या नावाने येथे एक विभाग सुरू केला. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सभेला राज्यातील शेती क्षेत्रात विशेषत: ऊस लागवडीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्य सरकार, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व सहकारी साखर कारखाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करेल. राज्यातील दहा हजार शेतकऱ्यांच्या शेतात ऊस लागवडीसाठी हे प्रायोगिक तंत्रज्ञान वापरण्यात येईल. त्यानंतर आणखी ९ हजार शेतकरी जोडले जातील.
‘एआय’च्या वापरामुळे पाण्याची व खर्चात ३० टक्के बचत होईल व ३० टक्के उत्पादन वाढ होईल.हा प्रकल्प यशस्वी झाल्यास सोयाबीन, तूर, कपाशी या पिकांसाठीही त्याचा वापर केला जाईल. हे तंत्रज्ञान कृषी क्षेत्रासाठी गेम चेंजर ठरेल. कृषी अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी डिजिटल साक्षरतेसाठी पंचवीस वर्षे योगदान देणारे एमकेसीएलचे माजी प्रमुख विवेक सावंत यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. डॉ. प्रेरणा शिंदे यांनी स्वागत केले. डॉ राजीव शिंदे यांनी प्रास्तावित केले. रजनी शिंदे यांनी पुरस्कार मानपत्र वाचन केले. रोहित शिंदे यांनी आभार मानले.
एचटीबीटी कॉटनवर न्यायालयाची बंदी ‘एचटीबीटी कॉटन’ लागवड करण्यास बंदी घातलेली होती, मात्र शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर आपण कृषिमंत्री असताना प्रयत्न केले. अगदी सर्वोच्च न्यायालयात लढाई लढलो, मात्र न्यायालयाने सरकारच्या विरोधात निकाल देत त्यावर बंदी कायम ठेवल्याचे शरद पवार यांनी सांगितले.