अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात; काही क्षणात झालं होत्याचं नव्हतं
1 min read
अहमदाबाद दि.११:- अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. यामध्ये 242 प्रवाशी होते. ज्या ठिकाणी विमान कोसळलं तिथून धुराचे लोट निघत असल्याचं दिसत आहे. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल झाला असून ही खूप मोठी दुर्घटना असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दुर्घटनेत किती हानी झाली आहे हे अद्याप समजलेलं नाही.हे विमान रहिवासी भागात कोसळल्यामुळे मोठी हानी झाली असण्याची शक्यता वर्तवली आहे.
मात्र त्याबाबतची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. एअर इंडियाच्या एआय-१७१ (बोइंग ७८७-८ ड्रीमलायनर विमान – सीरियल नंबर ३६२७९) या प्रवासी विमानाचा अपघात झाला आहे. २४२ प्रवाशांना घेऊन हे विमान अहमदाबादवरून लंडनला जात होतं. तसेच यात दोन पायलटसह १२ क्रू सदस्य होते.
अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सीमेजवळच ही दुर्घटना घडली आहे. या विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काहीच मिनिटात (७ किमी दूर) ते कोसळलं. विमानाचे पंख तुटून बाजूला पडल्याचं व्हिडीओंमध्ये दिसतंय.
दरम्यान, अहमदाबाद पोलीस व अग्निशमन दलाने बचावकार्य सुरू केलं आहे.विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट होऊन विमानाने पेट घेतला आहे. त्यामुळे ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सात गाड्या व बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचं काम चालू आहे.
बचावकार्यासाठी आपत्कालीन बचाव पथक देखील मेघानीनगरमध्ये दाखल झालं आहे. पाठोपाठ सीमा सुरक्षा दल व एनडीआरएफची पथकं देखील बचावकार्यासाठी रवाना झाली आहेत. एअर इंडियाने देखील या दुर्घटनेची पुष्टी केली आहे.
मात्र, या अपघाताचं कारण स्पष्ट केलेलं नाही. या विमान दुर्घटनेची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल व अहमदाबादच्या पोलीस आयुक्तांना फोन करून केंद्र सरकारकडून पूर्ण मदतीचं आश्वासन दिलं आहे.