गोदावरी नदीत ६ मुले बुडाली; नदीकाठी कुटुंबाचा काळीज पिळवटणारा आक्रोश

1 min read

गडचिरोली दि.८:- महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवर शनिवारी एक दुःखद घटना घडली. गोदावरी नदीत एकाच कुटुंबातील सहा मुले बुडाली आहेत. ही मुले एका विवासोहळ्यासाठी आली होती. आंघोळ करताना पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली. तेलंगणा पोलीस आणि स्थानिक मच्छीमारांनी मुलांचा शोध घेतला, पण ते अद्याप सापडले नाहीत.याबाबतची अधिक माहिती अशी की, तेलंगणातील अंबडपल्ली येथे एक विवाह सोहळा होता. त्यासाठी काही पाहुणे आले होते. शनिवारी सायंकाळी पाहुण्यांच्या कुटुंबातील सहा मुले नदीवर आंघोळीसाठी गेली. नदीच्या पात्रात उतरल्यावर त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे सर्व मुले बुडाली. ही मुले 11 ते 18 वयोगटातील होती. घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांसह इतर लोकांनी नदीकडे धाव घेतली. तेलंगणाचे मंत्री श्रीधर बाबू यांनी पोलिसांना तातडीने शोध मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले. ते म्हणाले, आम्ही तत्काळ शोध मोहीम राबवण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.त्यानंतर महादेवपूर पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण रात्रीपर्यंत त्यांना यश आले नाही. पावसाळ्यामुळे नद्यांना खूप पाणी आले आहे. नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. गोदावरी नदीची पाणीपातळीही वाढलेली आहे. त्यामुळे शोधकार्यात अडचणी येत आहेत. रविवारी सकाळी शोध मोहीम पुन्हा सुरू होणार आहे. दरम्यान, एकाच कुटुंबातील सहा मुले गोदावरी नदीत बुडाल्यानंतर या दुर्घटनेमुळे परिसरात शोक पसरला आहे. मुलांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे