अतिवृष्टीमुळे झालेल्या संकटात शेतकऱ्यांच्या फक्त सोबत नसून त्यांना मदत मिळून देणार:- खा.निलेश लंके
1 min read
अहिल्यानगर दि.३०:- दोन दिवसांपूर्वी अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर येथील अनेक गावांमध्ये शेतीचे, जनावरांचे आणि घरमालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या आपत्तीमुळे अनेकांचे संसार आणि जनावरे अक्षरशः डोळ्यादेखत वाहून गेले. ही दृश्यं मनाला हादरवणारी होती. अशा कठीण वेळी वाळकी, खडकी, सारोळा कासार, अकोळनेर आणि सोनेवाडी या गावांना भेट देऊन खासदार निलेश लंके यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकरी बांधव, महिलावर्ग, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधून त्यांच्या व्यथा आणि अडचणी समजून घेतल्या.
पाण्याखाली गेलेली पिकं, ओसाड पडलेली जनावरांची गोठी, घरात घुसलेलं चिखलाचं पाणी हे सगळं त्यांच्या डोळ्यातील अश्रूंमध्ये स्पष्ट दिसत होतं.या पार्श्वभूमीवर, खासदार लंके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असून, शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना योग्य ती नुकसानभरपाई मिळावी.
यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरू केला आहे. जनावरांच्या अन्नाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीत तातडीने चाऱ्याची व्यवस्था केली. पूरग्रस्त १५० कुटुंबांना किराणा किट वाटप करण्यात आले. वाळकी येथील ज्या बंधाऱ्याचे दरवाजे बंद होते ते खासदार लंके यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने खुले करून दिले.
जेणेकरून पुन्हा ही परिस्थिती उद्भवणार नाही. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे दोन ते तीन दिवस अंधारात असलेल्या गावांमध्ये MSEB अधिकाऱ्यांशी चर्चा करून वीज सुरळीत करण्याची कार्यवाही त्वरित पार पाडली.
शेतकऱ्यांचं हे दुःख माझं स्वतःचं दुःख आहे. मी केवळ एक खासदार म्हणून नव्हे, तर त्यांच्या घरचा माणूस म्हणून त्यांच्या पाठीशी उभा आहे.
शेतकरी हा माझ्या हृदयाचा केंद्रबिंदू आहे आणि त्यांच्या न्यायासाठी मी सदैव सज्ज आहे. संकट कितीही मोठं असलं, तरी आपली एकजूट आणि आपली लढण्याची ताकद यापेक्षा नेहमीच मोठी राहील हाच एक विश्वास. असे लंके यांनी म्हटले.