महाराष्ट्रातील देवस्थानांचे रुपडे पालटणार; ओझरच्या श्री विघ्नेश्वर मंदिरासाठी 7 कोटी 84 लाख

1 min read

मुंबई दि.२९:- राज्य सरकारने राज्यातील देवस्थानांचे रूपडे पालटण्यासाठी बुधवारी महत्त्वाचे शासन निर्णय घेतले आहेत. त्यात अष्टविनायक मंदिरांच्या जीर्णोद्धार आणि विकासासाठी 147.81 कोटी रुपयांसह कोल्हापूरच्या श्री क्षेत्र जोतिबा मंदिर आणि तुळजापूरच्या तुळजाभवानी देवी मंदिर विकासासाठी भरघोस निधीला मंजुरी देण्यात आली. अष्टविनायकांच्या जीर्णोद्धाराच्या प्रस्तावाला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या माध्यमातून चौंडी येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता घेण्यात आली. त्यानंतर दोन आठवड्यातंच 147.81 कोटी खर्चाचा सुधारित प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय बुधवारी जारी झाला. पुणे जिल्ह्यातील मोरगावच्या श्रीमयुरेश्वर मंदिरासाठी 8 कोटी 21 लाख, थेऊरच्या श्रीचिंतामणी मंदिरासाठी 7 कोटी 21 लाख, ओझरच्या श्रीविघ्नेश्वर मंदिरासाठी 7 कोटी 84 लाख, रांजणगावच्या श्रीमहागणपती मंदिरासाठी 12 कोटी 14 लाख, रायगड जिल्ह्यातील श्रीवरदविनायक मंदिरासाठी 28 कोटी 24 लाख रुपये, पालीच्या श्रीबल्लाळेश्वर मंदिरासाठी 26 कोटी 90 लाख, अहिल्यानगरच्या श्रीसिद्धटेक मंदिरासाठी 9 कोटी 97 लाख रुपये मंजूर करण्यात आले. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरच्या तुळजाभवानी देवी मंदिर विकासासाठी 1 हजार 865 कोटी रुपयांच्या आराखड्यास राज्य सरकारच्या वित्त व नियोजन विभागाने प्रशासकीय मान्यता दिली. देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी आदिशक्तीचे मूळ स्थान तुळजापूर येथे आहे. ऐतिहासिक, आध्यात्मिक, सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या तुळजाभवानी देवस्थानच्या विकासाच्या दृष्टीने हा शासन निर्णय महत्त्वाचा मानला जातो. लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कोल्हापूरच्या श्री क्षेत्र जोतिबा मंदिर येथील विकास कामांसाठीही मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे