अंत्यविधीसाठी जाताना काळाचा घाला; कार थेट पूलावरून खाली कोसळली;५ जणांचा जागीच मृत्यू
1 min read
खेड दि. १९:- मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदीच्या पुलावरुन कार थेट 100 फूट खाली कोसळली. यामध्ये कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या कारमधील सर्वजण मुंबईतून संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथे अंत्यविधीसाठी जात होते. मात्र, वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. या दुर्घटनेत कारचा चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालायत उपचार सुरु आहेत.कारमधील सर्वजण मुंबई मिरारोड-भाईंदर येथून रात्री साडेअकराच्या सुमारास गावी देवरूख येथे जाण्यास निघाले होते. आपल्या ताब्यातील किया कारने हे कुटुंब निघालं होतं.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भरणे नाका येथे आल्यावर जगबुडी नदीवरील असलेल्या मोठ्या पुलावरून कार थेट नदीत कोसळली. ही भीषण घटना पहाटे पाच ते साडेपाचच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच खेड येथील नागरिकांनी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
कारमधून जखमींना तातडीने बाहेर काढून कळंबणी येथील रुग्णालयात तातडीने हलवण्यात आलं. मात्र, या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. घटनास्थळी मदतीकरता खेड येथील माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह नागरिकांनी व पोलिसांनी व महामार्ग पोलिसांनी धाव घेतली होती.
तातडीने कारमध्ये अडकलेल्या सगळ्यांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर क्रेनच्या मदतीने ही कार बाहेर काढण्यात आली. या सगळ्या अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही खेड पोलिसांकडून सुरू आहे.