शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या:- खासदार संजय राऊत
1 min read
मुंबई दि.२४:- शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. बाळासाहेबांनी या देशात हिंदुत्त्वाचं बिज रोवलं आणि वाढवलं त्यांना अद्याप भारतरत्न का दिलं नाही? असा सवाल राऊत यांनी केला. बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होणार आहे, त्याआधी त्यांना भारतरत्न देणं गरजेचं आहे. हे वीर सावरकरांना देखील भारतरत्न देऊ शकले नाहीत. त्यामुळे बाळासाहेबांना भारतरत्न दिलात तर तो सावरकरांचाही गौरव ठरेल, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत म्हणाले की, ही पत्रकार परिषद घेण्यासाठी आम्हाला उद्धव ठाकरेंनी पाठवलं आहे. आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. आज बाळासाहेब आपल्यात नाहीत. पण या महाराष्ट्राच्या कणाकणात बाळासाहेब आपल्याला पाहायला मिळतात.
आपण आज जो महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राची अस्मिता म्हणतो, हा स्वाभिमान बाळासाहेबांमुळेच शिल्लक आहे. याच कारणास्तव त्यांना मराठी मनाचे मानबिंदू असं म्हटलं जातं. बाळासाहेब हयात असताना जी लोक त्यांना भेटलीत, त्यांच्या संपर्कात आलीत, ते लोक खरंच भाग्यवान आहेत.
आम्ही त्यांच्यासोबत अनेक वर्ष आहोत. त्यामुळे आम्हीदेखील स्वतःला भाग्यवान समजतो. आज बाळासाहेब आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांनी आम्ही कायम त्यांना आमच्यासोबत ठेवलंय, असंही संजय राऊतांनी सांगितलं.
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर महाराष्ट्राला स्वाभिमानाची, लढण्याची प्रेरणा देण्याच काम माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. आजही पिढ्या बदलल्या महाराष्ट्रातल्या. पण येणारी प्रत्येक मराठी पिढी ही माननीय शिवसेनाप्रमुखांच ऋण मान्य करुन बाळासाहेबांचा विचार पुढल्या पिढीला देऊन पुढे जाते.
बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्राला, देशाला समाजाला बऱ्याच गोष्टी दिल्या, ते सत्तेवर कधी आले नाहीत. म्हणजे मुख्यमंत्री, राज्यपाल कधी झाले नाहीत. ही सगळी पद सहकाऱ्यांना, सामान्य शिवसैनिकांना दिली. सामान्यातल्या सामान्य माणसाला शूर-वीर करण्याच काम बाळासाहेब ठाकरे यांनी केलं, अशा भावना खासदार राऊत यांनी व्यक्त केल्या आहेत.
पुढे बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, 2026 ला बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होतंय. इतक्या वर्षात आतापर्यंत शिवसेनेनं बाळासाहेबांसाठी काही मागितलं नाही. पण आता तशी वेळ आलीय. बाळासाहेबांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं, अशी आमच्यासह सर्व हिंदूंची मागणी आहे.
खरं तर मागील 12 वर्षांत ही मागणी कधी झाली नव्हती. ही मागणी संसदेत झाली. विधीमंडळात झाली. पण अशा प्रकारे पत्रकार परिषद घेऊन कधी केली नव्हती. राजकारणासाठी मोदी सरकारने अनेकांना भारतरत्न दिलं. पण ज्यांनी या देशातील हिंदूंना, महाराष्ट्रातील लोकांना मराठी म्हणून अस्मिता दिली.
त्यांचा खरंच सन्मान करायचा असेल तर बाळासाहेबांना भारतरत्न द्यावा, असंही राऊत म्हणाले.बाळासाहेब देशातील कोणत्याच पदावर नव्हते. पण त्यांनी लोकांच्या मनावर राज्य केलंय. लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यानंतर हिंदुत्वासाठी कोणी लढले असेल तर ते बाळासाहेब ठाकरे होते.
जेव्हा देशात कुठेही हिंदूंवर हल्ले झाले, तिथे बाळासाहेब उभे राहिले. या सरकारने बांधलेलं राम मंदिर बाळासाहेबांची देण आहे. भारतरत्न पुरस्काराच्या मागणीसाठी आम्ही कोणताही पत्रव्यवहार केलेला नाही. कारण हा केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येणारा विषय आहे.
हा पूर्ण अधिकार प्रधानमंत्र्यांचा आणि गृहमंत्र्यांच्या विषय आहे. केंद्र सरकारची एक समिती आहे, ती यावर निर्णय घेते. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी ट्विट करून अभिवादन करण्यापेक्षा बाळासाहेबांना भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करावा, असेही संजय राऊत म्हणाले.