भारताने तो निर्णय घेतल्यास आम्ही लगेच हल्ला करणार; पाकिस्तानचा थयथयाट
1 min read
नवीदिल्ली दि.३:- पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना ठेचा, बदला घ्या, पाकिस्तानला कायमची अद्दल घडवा, अशी मागणी भारतभरातून होत आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्कराच्या मोठ्या कारवाया सुरू आहेतच, मात्र दहशतवाद्यांचे आका सीमापार पाकिस्तानात आहेत. त्यांना धडा शिकवण्याची तयारी सुरू झाली आहे.पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने तात्काळ पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानच्या शेती, जलविद्युत उत्पादन आणि पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. पाकिस्तानच्या शेतीसाठी आवश्यक पाण्याचा 80% हिस्सा या करारामुळे मिळत होता.
त्यामुळे भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानची पाणी कोंडी झाली आहे. भारताने सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी पुन्हा एकदा भारताला पोकळ धमकी दिली आहे.पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी भारताला पुन्हा एकदा पोकळ धमकी दिली आहे. भारताने सिंधू नदीवर धरण बांधून पाणी अडवलं तर पाकिस्तान हल्ला करेल,
असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणालेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेतलाय आणि तेव्हापासून दररोज पाकिस्तानचा एक मंत्री बरळताना दिसत आहे. भारतीय आक्रमणाच्या भीतीने पाकिस्तान बिथरला असून बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याच्या तयारीत आहे.
पाकिस्तान जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भारत बदला घेणार या भीतीने पाकिस्तानने याआधीच अरबी समुद्रात युद्धसराव सुरु केला आहे.
शिवाय नियंत्रण रेषेवरही पाकच्या कुरापती सुरु असून सातत्याने शस्त्रसंधींचं उल्लंघन केलं जात आहे. त्यातच आता बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी करुन भारताला चिथावणी देण्याचा पाकिस्तानचा निष्फळ प्रयत्न सुरु आहे.